ऋणानुबंध संस्थेची स्थापना आणि पहिला उपक्रम: पाणी वाटप
३जुलै २०१२ मध्ये स्थापन झालेली ‘ऋणानुबंध’ संस्था, तिच्या सुरुवातीच्या प्रवासात अनेक आव्हानांचा सामना करत होती. संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आम्हाला ३ सप्टेंबर २०१२ उजाडले. हा दिवस संकष्टी चतुर्थीचा होता आणि त्या दिवशी मुसळधार पाऊस पडत होता ; तरीसुद्धा या पावसात आम्ही संस्थेचे नोंदणी पत्र आणले आणि ते पावशा गणपतीच्या चरणाशी ठेवले. यानंतर संस्थेची कागदपत्रे तयार करणे, लेटरहेड छापणे, शिक्के तयार करणे यासारख्या कामांची सुरुवात झाली.
सुरुवातीला देणग्या मिळवणे फार कठीण होते आणि त्यामुळे सर्व खर्च सभासद वर्गणीतून चालू होता. १५ दिवसांनी गणेशोत्सव सुरू झाला. विसर्जनाच्या दिवशी मला जाणवले की, एखादा उपक्रम हाती घेणे आवश्यक आहे. विचार करत असताना लक्षात आले की NDA रोडवर गणेश विसर्जन मिरवणूक जाते. साधारणत: १/२ किलोमीटरच्या अंतरावर गणेश विसर्जन मिरवणुकीत अनेक कार्यकर्ते आनंदाने नाचत असतात, त्यांना पाण्याची गरज असते. परंतु, रस्त्यात कोठेही पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती आणि कोणी ते करतही नव्हते.
त्यावेळी, आम्ही पाणी वाटपाचा कार्यक्रम हाती घेण्याचा निर्णय घेतला. ह्यासाठी पावशा गणपती देवस्थानचे विश्वस्त दिनकर दांगट यांनी खूप सहकार्य केले. त्यांनी पाणी, ड्रम, जागा आणि चहापाण्याची मदत केली. त्यांच्या सहकार्यातून आमचा पहिला पाणी वाटपाचा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. या उपक्रमात सर्व विश्वस्त आणि अनेक सदस्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता.
‘ऋणानुबंध’ च्या या पहिल्या उपक्रमाने संस्थेची समाज सेवेतील ओळख मजबूत केली आणि भविष्यातील अनेक उपक्रमांसाठी प्रेरणा मिळाली.