वर्गणीतून राहिलेले पैसे अजून काही जणांनी वापरले आणि परत केले. एके दिवशी मंदिरात एक पालक शालेय मदत मागण्यासाठी आले. त्यांना आम्ही आमच्या पैशातून थोडी मदत केली. याच घटनेतून आम्हाला संस्था स्थापन करण्याची कल्पना सुचली.
सर्वांनी एकत्र बसून संस्थेच्या स्थापनेचा विचार केला. सभासद शुल्क १०० रुपये ठरवले आणि किमान ५० सभासद करायचे ठरवले. प्रसाद धारेश्र्वर यांना ही कल्पना सांगितली. त्यांनी तत्काळ १०१ रुपये काढून दिले आणि म्हणाले, “ही माझी सभासद वर्गणी!” हेच आमचे पाहिले सभासद ठरले पुढे ते कार्यकारी मंडळावर आले व संस्था पुढे नेण्यास त्यांनी खूप सहकार्य केले.पहिल्या दिवसा पासून आम्ही सभासद जमा करायला सुरुवात केली. ५० सभासद जमा होऊन ५००० रुपये जमा झाले. ५० सभासादांपैकी ९ जणांचे कार्यकारी मंडळ तयार झाले. हरिदास खेसे , दत्तात्रय पठारे, गिरीश जोशी, संजय मोरे, प्रसाद धरेश्वर, भरत पाटील, प्रसाद जानवेकर, सौ रंजनाताई बोरकर ,इंदुबाई शिवले यांचे कार्यकारी मंडळ अस्तित्वात आले. आमच्यात त्यावेळी जास्त शिकलेले हरिदास खेसे हे होते म्हणून आम्ही त्यांना अध्यक्ष पद दिले. पुढे संस्थेचे नाव ठरवण्याची वेळ आली. ‘कर्तव्य’ आणि ‘ऋणानुबंध’ अशी दोन नावे पुढे आली होती. कोणते नाव ठेवायचे याचा निर्णय होईना कारण दोन्ही नावे आवडली होती. शेवटी मोरयाला शरण गेलो. मोरयाच्या समोर चिठ्ठ्या टाकल्या आणि मोरयाने ‘ऋणानुबंध‘ चे नाव निश्चित केले. वकिलांना भेटून संस्था स्थापनेची कल्पना दिली. त्यांनी १५ दिवसात सर्व कागदपत्रे तयार केली आणि ३ जुलै २०१२ रोजी कार्यकारी मंडळाच्या सर्व सदस्यांनी त्यावर स्वाक्षरी केली. अशा प्रकारे, ‘ऋणानुबंध’ सामाजिक संस्था अस्तित्वात आली. हे सर्व मोरयाच्या समोर आणि त्याच्या आशीर्वादाने झाले.